Anganwadi Cum Creche केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य उपक्रमात आता महिलांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांना नोकरीदरम्यान त्यांच्या लहान मुलांची योग्य काळजी घेता यावी यासाठी ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीत ‘पाळणा योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे कामगार आणि नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळणार असून, मुलांच्या संगोपनासाठी सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 345 पाळणाघरे सुरू
महाराष्ट्रात सुरुवातीच्या टप्प्यात ३४५ ठिकाणी पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पाळणाघरांमध्ये डे-केअर सुविधा, पूर्वशालेय शिक्षण, पूरक पोषण आहार, वाढीचे निरीक्षण, आरोग्य तपासणी आणि लसीकरण यांसारख्या सेवा दिल्या जाणार आहेत. इतकेच नाही तर मुलांना दिवसातून तीन वेळा – सकाळचा नाश्ता, दुपारचे गरम शिजवलेले जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता देण्यात येणार आहे.
पाळणाघरातील सोयी-सुविधा आणि वेळापत्रक: प्रत्येक पाळणाघर महिन्यात २६ दिवस, रोज ७.५ तास सुरु राहील. एका केंद्रात २५ मुलांपर्यंत प्रवेश दिला जाईल. या ठिकाणी एक पाळणा सेविका आणि एक पाळणा मदतनीस नेमण्यात येईल. वीज, शुद्ध पिण्याचे पाणी आणि बालस्नेही शौचालय यांसारख्या सोयीसुविधाही उपलब्ध असतील.
मानधन आणि भत्ता यामध्ये वाढ
या कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविकांना १५०० रुपये प्रतिमाह भत्ता, अंगणवाडी मदतनीस यांना ७५० रुपये, पाळणा सेविकांना ५५०० रुपये प्रतिमाह मानधन आणि पाळणा मदतनीस यांना ३ हजार रुपये प्रतिमाह भत्ता देण्यात येणार आहे.
महिलांसाठी आणखी मोठे निर्णय
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात लाडकी बहीण योजना पाच वर्षे सुरू राहणार असल्याची घोषणा केली. सध्या मिळणारे १५०० रुपये मानधन पुढे योग्यवेळी वाढविले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय राज्यातील महिला बचत गटांद्वारे २५ लाख लखपती दीदी तयार झाल्या असून यंदा आणखी २५ लाख दीदी घडवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुढील काही वर्षांत ही संख्या एक कोटीवर पोहोचेल.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लखपती दीदी योजना आणि मुलींसाठी केजी ते पीजी मोफत शिक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी म्हणून पहिल्या टप्प्यात दहा मॉल उभारले जात आहेत.